सुस्वागतम्

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

राहुल गांधी यांस अनावृत्त पत्र

       राहुल बाळा, तू वयाची चाळीशी गाठलीस पण तुझा बालपणीचा अल्लडपणा अजून गेलेला दिसत नाही. अन्यथा एखाद्या परदेशी राजदुतासमोर तू आपल्याच देशबांधवांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यांच्यावर आरोपांची चिखलफेक केली नसतीस. मागे तू म्हणे भारताचा ‘शोध’ घेण्यासाठी देशभर हिंडलास. इतकेच नव्हे तर दलिताच्या घरी जेवून, तू बातमीसाठी हपापलेल्या आणि सतत कुत्र्याप्रमाणे तुझ्या अवती-भवती फिरणाऱ्या पत्रकारांना ‘ब्रेकिंग न्यूज’ दिलीस. अगदी काही दिवसांपूर्वी तू सुद्धा देशातील ‘सर्वसामान्य’ लोकांप्रमाणेच ट्रेन मधून प्रवास केल्याचे कळते. अरे मग एवढे फार्स करून सुद्धा तुला आपला देश, इकडची संस्कृती कळली नाही का?  

   

        तुझे खापरपणजोबा मोतीलाल नेहरू हे तत्कालीन काँग्रेसमधले वजनदार आणि प्रगल्भ नेतृत्व समजले जाई. त्यांचा वारसा उचलणारे तुझे पणजोबा आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी उच्चशिक्षण घेतले ते विदेशातच. त्यानंतर क्रमश: तुझी आजी इंदिरा गांधी, तुझे वडील आणि काका, राजीव व संजय गांधी यांच्यावर सुद्धा भारतीय संस्कृती आणि शिक्षणपद्धतीपेक्षा पाश्चात्य विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. तुझ्या मातोश्री आणि तुम्ही दोघेही भावंड यांना ‘भारतीय’ म्हणावे का, असा प्रश्न आम्हाला सुरवातीला पडलेला. 

       मग हळुहळू वाटायला लागल की, जरी तुम्ही परदेशी असलात तरी भारतीय मूल्यांचा तुमच्यावर सुद्धा प्रभाव पडला आहे. अरे खरचं.....!!!  अस कर ना, तू तुझ्या पणजोबांनी लिहिलेले ‘भारताचा शोध’ हे पुस्तक वाच. त्यांनी शक, हूण, कुशाण इथपासून मुघल राजा अकबर या सर्व बुभुक्षित विदेशी आक्रमकांचे भारतीय तत्त्वज्ञानामुळे झालेले हृदयपरिवर्तन मोठ्या गौरवाने लिहिले आहे. हे वाचताना कदाचित तुझी नजर नेहरूंनी केलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावर जाईल. पण शिवाजी महाराजांचा तुझ्या आजोबांनी ‘वाट चुकलेला देशभक्त’, असा उल्लेख हा केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ आहे, असे समजून तू तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करशील याची खात्री मला आहेच. 

अरे मुद्दा भरकटलो बघ..!! थोडक्यात काय तर असा आमचा देश. आता तुच त्याला आपला मानतोस की काय, ते मला माहीत नाही. पण तुझा गृहपाठ खूपचं कच्चा असल्याचे जाणवले. हिंदू सहनशील वगैरे आहेत खरे, पण त्यांचे मर्दानी रूप मुघल आणि इंग्रजांनी अनुभवले आहे. आम्ही शूर असलो तरी क्रूर नाही बर का? मग आम्ही आमच्याच देशात बॉम्बस्फोट घडवू, असा जावईशोध तुला कसा लागला बरे? भारत भ्रमण करताना एखादा बॉम्बनिर्मिती कारखाना तर नाही ना पाहिलास?

        अरे १९४७ सालापासून आजगायत आमच्या देशावर भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या अब्रुची लक्तरे आत्ता कुठे जागतिक वेशीवर टांगली जात असताना तू हिंदुंना आणि पर्यायाने समस्त भारतीयांनाच अतिरेकी कसे ठरवू शकलास? आम्ही ज्या भगव्या ध्वजाची शान मिरवतो ना, तो ध्वज अशी पुचाट कृत्य करण्याची बुद्धी आम्हाला कधीच देणार नाही. राहता राहिला प्रश्न तुझ्या वक्तव्यांचा. त्यावर तू महात्मा गांधींचे विचार नक्की वाच. तू आमूलाग्र बदलशील.

        हिंदू संस्कृती, परंपरा आणि हिंदू मन यांचा नेमका अर्थ तुला जेव्हा कळेल, तेव्हाच तू राजकारण करू शकशील. त्यासाठी तू इथल्या जनतेशी, त्यांच्या भावविश्वाशी आणि समस्यांशी समरसून जायला हवे. तरच कदाचित तुला राजकीय परिपक्वता येईल.